मुंबई : कॅम्स क्लब स्टुडीओ निर्मित नवी मालिका ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ १४ मे २०१८पासून सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता कलर्स मराठीवर सुरू होत आहे. पहिल्याच मालिकेमधून अवघ्या महाराष्ट्राचे मने जिंकलेली सुरभी हांडे या मालिकेमध्ये आरवीची भूमिका साकारणार आहे, तर ओमप्रकाश शिंदे मल्हार आणि निवोदित समृद्धी केळकर ही लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
एका सामान्य घरातून आलेली मुलगी जी निसर्गाने सजवलेल्या गावात वाढली, हिरव्यागार रानात रमली, नदी काठावर खेळली, शुभ पावलांनी गावात आली आणि सगळ्यांची लाडकी बनली; पण, जिचा हात तिच्या आईने ती लहान असताना सोडला आणि देवाघरी गेली अशी लक्ष्मी त्याक्षणीच पोरकी झाली. आईच्या नसण्यामुळे लक्ष्मीचे संपूर्ण भावविश्वच बदलून गेले; परंतु या परिस्थितीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती तिची आजी. लक्ष्मीची आजी तिला लहानपणापासून सांगत असे की, तुझ्या स्वप्नातला राजकुमार नक्की येईल, आणि तुझे आयुष्य प्रेमाने बहरून टाकेल. तेव्हापासून लक्ष्मी त्या राजकुमाराची स्वप्न पाहते आहे. जशी प्रत्येक मुलीची इच्छा असते की, तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा, आपल्याला आधार देणारा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात असावा, अशी इच्छा लक्ष्मीची देखील आहे. लक्ष्मीला तिचा राजकुमार मिळेल का, लक्ष्मी जसे तिच्या घरातल्यांवर नि:स्वार्थीपणे प्रेम करते तिला असे नि:स्वार्थी प्रेम कधी मिळेल का? दुसरीकडे मल्हार आणि आरवी हे जोडपे आहे ज्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. हे दोघेही लवकरच लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये अडकणार आहेत. जेव्हा दुसऱ्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी लक्ष्मी आणि एकमेकांवर नि:स्वार्थी प्रेम करणारे मल्हार आणि आरवी भेटतील तेव्हा काय होईल, हे जाणून घेण्यासाठी ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ ही मालिका पहावी लागेल.
या मालिकेच्या निमित्ताने ‘कलर्स मराठी- वायाकॉम १८’चे व्यवसायप्रमुख निखिल साने म्हणाले, ‘या मालिकेमध्ये आम्ही नि:स्वार्थी मनाने घरच्यांवर आणि गावावर प्रेम करणाऱ्या लक्ष्मीची गोष्ट दाखवणार आहोत. कलर्स मराठीद्वारे आम्ही नेहेमीच प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या मालिकेमधून दाखवली जाणारी कथा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असे मला वाटते. लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेद्वारे सात वाजताचा प्राईमटाईम बँड मजबूत होईल अशी आम्ही आशा करतो.’
आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना राकेश सारंग म्हणाले, ‘ही मालिका शहर आणि गाव यांतला दुरावा कमी करणारी मालिका आहे. शहरातल्या धुसमळत्या प्रेमाला अस्सल ग्रामीण प्रेमाने रंगवणाऱ्या या मालिकेमध्ये आम्ही अतिशय निरागस आणि अवखळ अशा लक्ष्मीचा प्रवास दाखवणार आहोत. मालिकेमध्ये अनुभवी कलाकारांचा संच आणि अनोखी संकल्पना असल्यामुळे ही मालिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री वाटते.’